पर्यावरण संवर्धनासाठी लंडन स्ट्रीट प्रकल्पाचा पुढाकार वृक्षतोडीपूर्वीच हजारो वृक्षांचे केले रोपण
★ आधुनिक सिंचन व्यवस्थेसह संवर्धनावर दिला जातो आहे भर
नागपूर ( दि. ८ मे २०२६ ) वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या गंभीर पार्श्वभूमीवर वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नागपूर शहरात विकसित होत असलेल्या लंडन स्ट्रीट या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या डेव्हलपरने पर्यावरण रक्षणासाठी उल्लेखनीय पुढाकार घेत मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वृक्षतोडीपूर्वीच हजारो वृक्षांचे रोपण करून त्यांचे दीर्घकालीन संवर्धन करण्यावर भर देण्यात येत आहे.
खामला ते जयताळा रोड परिसरात विकसित होत असलेल्या या प्रकल्पात प्रफुल्लवेद इन्फ्रा प्रा. लि. कंपनी प्लॉट क्रमांक ३, ४ आणि ५ वर काम करीत आहे. प्लॉट क्रमांक ५ वरील बांधकामासाठी अडथळा ठरणाऱ्या ७३ वृक्षांना हटविण्याची परवानगी २१ जून २०२३ रोजी नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून देण्यात आली होती. नियमानुसार या वृक्षांच्या बदल्यात २५६१ वृक्षांचे रोपण करणे आवश्यक होते. मात्र, पर्यावरणीय जबाबदारीचे भान ठेवत कंपनीने त्याहून अधिक म्हणजे तब्बल ३००० वृक्षांची लागवड केली.
या अंतर्गत तेलंगखेडी परिसरात २५०० तर दाभा परिसरात ५०० वृक्ष लावण्यात आले आहेत. ही वृक्षलागवड केवळ औपचारिकता न राहता त्यांचे संवर्धन आणि संगोपन प्रभावीपणे व्हावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येत आहे. वृक्षांचे जिओ टॅगिंग करण्यात आले असून त्यांच्या वाढीवर आणि स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
याशिवाय प्रकल्पाच्या प्लॉट क्रमांक ३ आणि ४ वरील २०५ वृक्ष हटविण्याची परवानगी कंपनीला प्राप्त झाली आहे. या वृक्षांच्या बदल्यात तब्बल ६६९८ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. मात्र, कंपनीने अद्याप या भागातील एकही वृक्ष तोडलेला नाही. उलट, नियोजित वृक्षारोपणाचे काम आधीच सुरू करण्यात आले आहे. तेलंगखेडी परिसरात सुमारे २००० वृक्षांचे रोपण पूर्ण झाले असून भांडेवाडी परिसरात उर्वरित वृक्ष लागवडीचे काम सुरू आहे. आतापर्यंत कंपनीने तेलंगखेडी भागात एकूण ४०८२ वृक्षांची लागवड केली आहे.
पर्यावरणपूरक दृष्टीकोन ठेवत या वृक्षांच्या संवर्धनासाठी बोअरवेल, ड्रिप सिंचन प्रणाली आणि सोलर पंप यांसारख्या आधुनिक सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. वृक्षांची नियमित देखभाल, पाणीपुरवठा आणि निगा राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
"विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ६६९८ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत प्लॉट क्रमांक ३ आणि ४ वरील एकही वृक्ष तोडला जाणार नाही. भविष्यातही पर्यावरण संरक्षणासाठी आमची बांधिलकी कायम राहील," असे कंपनीचे संचालक प्रफुल्ल देशमुख यांनी सांगितले.

































































































































































































































































































































































































































































































